आता स्वतंत्र महानगर वाहतूक प्राधिकरण   

मुंबई, (प्रतिनिधी) : महानगरांमध्ये वाहतुक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी किफायतशीर आणि सहज आणि सुलभरीत्या उपलब्ध होणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची आहे.  नागरिकांच्या ’इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन सेवेमध्ये अमुलाग्र बदल आवश्यक आहे. त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (युनिफाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी) स्थापन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.  या प्राधिकरणाचा कायदा करण्यापूर्वी त्यावर जनतेच्या सूचना व हरकती  घेऊन अंतिम निर्णय घेण्याचेही त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये महापालिका, राज्य परिवहन महामंडळ , रेल्वे, मेट्रो आदी यंत्रणांच्या माध्यमातून परिवहन सेवा कार्यान्वित आहेत. प्रवाशीभिमुख परिवहन सेवेसाठी सुसूत्रीकरण असणे गरजेचे आहे. महानगरांमधील परिवहन सेवेच्या विकास व विस्तारासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करणे गरजेचे आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध परिवहन सेवांचे एकच भाडे, शहरांमध्ये सुरू असलेले परिवहन प्रकल्प आदींबाबत समन्वय साधणे सोयीचे होईल.
 

Related Articles